स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे असे दिसते प्रतिबिंब

23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे.

अंदमानला जाण्यापूर्वी त्यांच्या ज्या गोष्टी जप्त करून लिलाव करण्यात आल्या त्यात राजयोग हा ग्रंथही होता. 1912 च्या डिसेंबरमध्ये त्यांचा लहान भाऊ नारायण यांनी त्यांना निवडक पुस्तके पाठवली. त्यात विवेकानंदांचे ग्रंथ बघून प्रसन्नता व्यक्त करणारे पत्र त्यांनी पाठवले होते. सावरकरांनी तुरुंगातच अधिकार्‍यांची संमती घेऊन दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय थाटले होते. ‘त्या ग्रंथालयात मासिके आणि विवेकानंदांची, रामकृष्णांची चरित्रे आणि ग्रंथ यांच्या तर किती प्रती होत्या ते पुसूच नये.’ असे म्हणतात. ते आपल्या आत्मकथेत लिहितात, ‘1898-99 च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली.. त्यांच्या ग्रंथांमुळेच गणेश सावरकर यांच्या मनात हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी अतुट आस्थेचा उदय होत होता. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणाही यातूनच मिळत होती.’

स्वामी विवेकानंदांची अशी इच्छा होती की, ज्या लोकांनी हिंदूधर्म सोडून परधर्माचे अवलंबन केले आहे, त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचा प्रयत्न व्हावा. तसेच धर्मांतरण थांबवण्यात यावे. सावरकरांनी या दिशेनेही बरेच कार्य केले. अंदमानात फसवून धर्मांतर केलेल्या मुलाला पुन्हा हिंदू करताना सावरकरांनी विवेकानंदांचा दाखला दिला होता. सावरकरांच्या जीवनचरित्राचे अवलोकन करताना ध्यानात येते की, त्यांचे जीवन हे विवेकानंदांच्या विचारांचे कृतिशील रूप होते. विवेकानंदांनी जाहीरपणे सांगितले की, ‘तूर्तास, बासरी वाजवणार्‍या र्शीकृष्णाला दूर ठेवून गीतेमधील सिंहाप्रमाणे गर्जना करणार्‍या र्शीकृष्णाची तुम्ही पूजा करा.. गुळगुळीत योजनांपेक्षा तुमच्या ‘रक्तातील धमक’ आणि नसानसांतून वाहणार्‍या पोलादी ताकदीची खरी गरज आहे.’ सावरकरांच्या जीवनात याच विचारांचे प्रतिबिंब दिसत नाही काय?

Scan the code